How to Plant and Grow Bamboo

बांबूची लागवड :
बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे आठ ते 25 अंश से. तापमान, सरासरी प्रति वर्षी 750 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, पानथळ जमिनी बांबूच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.

बांबूची अभिवृद्धी –
अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून व कंदांपासून करण्यात येते. बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपे दोन प्रकारांनी तयार करतात – 1. गादी वाफ्यात बी पेरून व 2. पॉलिथिन पिशवीत बी लावून. बांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादी वाफ्यावर पेरून तयार करावीत, त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी सर्वसाधारणपणे एक मीटर व लांबी सोयीनुसार दहा मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर 30 सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बी पेरणी करावी. बियांची पेरणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे जून व जुलै महिन्यात लागवडीसाठी वापरता येतात.
बांबूच्या रोपांची निर्मिती ही बियाणे पॉलिथिन पिशवीत लावूनसुद्धा करता येते. यासाठी 25 सें.मी. 12 सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे 1 ः 1 ः 1 मिश्रण करून ते पॉलिथिन पिशवीत भरून, प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते आणि बियाणे कमी लागते.

कंदांद्वारे अभिवृद्धी –
बांबूची लागवड ही साधारणपणे 3 3 मीटर ते 7 7 मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. बांबूचे बेट हे प्रत्येक वर्षी येणाऱ्या बांबूंमुळे पसरत असल्याने, त्याचप्रमाणे त्याचा कालावधी 35 – 40 वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबू तोडणीस अडचण येत नाही. सर्वसाधारणपणे 5 5 मीटर अंतरावर बांबूची लागवड केल्याने एक हेक्‍टर अंतरावर 400 बांबूची रोपे बसतात.बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात पाच मीटर अंतरावर 60 60 60 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. अशा या खोदलेल्या खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, 50 ग्रॅम अमोनिअम सल्फेट आणि 200 ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी.

लागवडीनंतरची निगा –
बांबू लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते. बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने यांची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात, तसेच तण आणि झुडपे यांचीही मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हीची स्पर्धा होते, त्यामुळे वेळोवेळी रोपांभोवतालचे तण काढणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील यासाठी काळजी घ्यावी. यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताचा, धसकटाचा आच्छादन म्हणून उपयोग केल्यास ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कालांतराने त्याचा खत म्हणूनसुद्धा उपयोग होतो.

आंतरपीक –
बांबू लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते, तेव्हा सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पट्ट्यात मूग, उडीद, कुळीथ व सोयाबीनसारखी आंतरपिके घेण्यास हरकत नाही, त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच, शिवाय जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन –
साधारणपणे 750 ते 800 मि.मी. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी बांबूस पाणी देण्याची गरज भासत नाही, तरीही लागवडीनंतर एक ते दोन वर्षे, विशेषतः उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्‍यकता पडते. हलक्‍या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने, तर मध्यम व भारी जमिनीत 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक ते दोन वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.

छाटणी –
प्रत्येक कळकाच्या पेऱ्यामध्ये फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. या फांद्यांचा नवीन येणाऱ्या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये म्हणून त्यांची छाटणी करणे आवश्‍यक ठरते, त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत करावी.

बांबूची काढणी –
लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनी बांबू काढण्यास सुरवात होते. रोगराईपासून संरक्षण व नवीन फुटीला प्राधान्य यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायदेशीर ठरते. बांबू तोडताना तो जमिनीलगत न तोडता, दुसऱ्या व तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी (30 सें.मी. अंतरावर) धारदार कुऱ्हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळाच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूचे खोडमूळच मरते. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत करावी, एप्रिल ते ऑक्‍टोबर या महिन्यांत करू नये, कारण या काळात बांबूची अत्यंत जलद गतीने वाढ होत असते.

उत्पादन –
लागवड पद्धती व योग्य व्यवस्थापन यावर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर पाचव्या वर्षापासून सुरू होते. 5 5 मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्‍टरी 400 रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी 2000 बांबू मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडून प्रति नगास 15 रुपये भाव धरला तरी एकूण तीस हजार रुपये उत्पन्न प्रति हेक्‍टरी मिळण्यास सुरवात होते. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर सलग 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर प्रत्येक वर्षी गरज असल्यास पाणी आणि खते देणे याशिवाय इतर कसलीही मशागत करावी लागत नाही, शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पन्न 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढत जाते. हलक्‍या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणात देखील सहाव्या वर्षापासून दोन इंच व्यासाचे व 18 फूट लांबीचे बांबू मिळतात.

महाराष्ट्रात आढळणारे प्रकार –
मानवेल – हा प्रकार महाराष्ट्राच्या सगळ्या भागांत आढळतो. त्याची उंची 8 ते 16 मीटरपर्यंत, तर व्यास दोन ते आठ सें.मी.पर्यंत असतो. एक पेर 30 ते 45 सें.मी. लांबीचे असते. बुरुड काम करणारे टोपल्या, सुपे यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी या प्रकारचा बांबू वापरतात.
कटांग, काटस – या जातीचे बांबू 15 ते 30 मीटर उंच आणि तीन ते सात सें.मी. व्यासाचे असतात. त्यांचे एक पेर 25 ते 45 सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी याचा उपयोग होतो. कोंड्या मेस ः बारीक विणकाम करण्यासाठी या बांबूचा उपयोग होतो. याची उंची 16 ते 23 मीटर, व्यास 8 ते 15 सें.मी. तर पेराची लांबी 20 ते 45 सें.मी. एवढी असते.ः याचा वापर फर्निचर बनविण्यासाठी करतात.
पिवळा बांबू – घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड.
चिवळी – टोपल्या व घरबांधणीसाठी उपयोग. उंची नऊ मीटर, व्यास अडीच ते चार सें.मी., तर पेर 15 ते 30 सें.मी. लांबीचे असते.

बांबूचे उपयोग –
कागदनिर्मिती, कृत्रिम रेशीम, पशुखाद्य, मानवी खाद्य, विविध हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती यांसाठी बांबूचा उपयोग होतो.
जमिनीची धूप थांबविणे, भूगर्भातील पाण्याचे झरे जिवंत करणे, अवनत क्षेत्राची सुधारणा करणे, वारारोधन, नदीकाठांचे संरक्षण, वातावरणातील कार्बनचे शोषण, जैवविविधतेचे संरक्षण आदी अनेक कारणांसाठी बांबूचा वापर उपयुक्त ठरतो.
कोळसा, विमानाचे भाग, चटया यांसारखी औद्योगिक उत्पादने, मासेमारीची साधने, शेतीची अवजारे, पॉलिहाऊस यांच्या निर्मितीसाठीही बांबूचा उपयोग केला जातो.
बांबूचा वापर करून कार, लॅपटॉप, सौरचूल यांसारखी नवनवी उपकरणे तयार करण्याचेही प्रयोग यशस्वी झाले आहेत.
याशिवाय बांबूच्या कोंबांची भाजी, लोणचे, चटणी, व्हिनेगार, इत्यादी पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करता येतात. बांबूचे काही औषधी उपयोगही आहेत.
केंद्र सरकार देशातील वन क्षेत्र व वन क्षेत्राबाहेर लागवड होणाऱ्या बांबूच्या सर्वंकष विकासासाठी राष्ट्रीय बांबू अभियान राबवत आहे.

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj