सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘नेसरी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले. ‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर हो...